तहसीलदार हरीश सोनार यांचा एजंट व दलालांना इशारा

येवला तहसील कार्यालयाच्या कामकाजात एजंट व दलालांचा हस्तक्षेप वाढू लागला आहे. राजकीय दबाव आणून कागदपत्रांची पूर्तता न करताच शिधापत्रिकांसह विविध दाखल्याची मागणी दलालामार्फत केली जाते. अशाप्रकारे त्रयस्थ व्यक्तीमार्फत कुणीही दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा तहसीलदार हरीश सोनार यांनी दिला आहे.

येथील तहसील कार्यालयात आयोजित तालुका दक्षता व पुरवठा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष दीपक देशमुख होते. प्रारंभी 26 नोव्हेंबर 2008 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवान व नागरिकांना र्शद्धांजली अर्पण करण्यात आली.

तहसीलदार सोनार यांनी नागरिकांनी तहसील कार्यालयाची संबंधित स्वत:चे काम प्रत्यक्ष तहसील कार्यालयाशी संपर्क साधून व आवश्यक कागदपत्रे जोडून करून घ्यावीत. कुठल्याही कामासाठी दलाल व एजंट यांच्याशी संपर्क साधू नये. व एंजटांना कामाचे पैसेही देऊ नये, असे आवाहन केले. नोव्हेंबर महिन्यात एपीएल, बीपीएल व अंत्योदय कार्डधारकांसाठी मंजूर करण्यात आलेल्या धान्याच्या नियतनाबाबत माहिती समिती सदस्यांना देण्यात आली.

मागील महिन्यात प्राप्त न झालेली साखर या महिन्यात कमी प्रमाणात म्हणजेच 300 क्विंटल प्राप्त झाल्याने प्रतिमाणशी 250 ग्रॅम या प्रमाणात स्वस्त धान्य दुकानांमार्फत लाभार्थ्यांना ती वाटण्यात येईल, अशी माहिती तहसीलदारांनी दिली.

या वेळी नगराध्यक्ष नीलेश पटेल, पंचायत समिती सभापती शिवांगी पवार, गटविकास अधिकारी अजय जोशी, संतूपाटील झांबरे, अंजना शेळके आदी उपस्थित होते.

 
थोडे नवीन जरा जुने