मांजरपाडा प्रकल्पाच्या कामास गती देण्यासाठी प्रयत्न करणार : डमाळे तांदूळवाडी येथे बैठक संपन्न



मांजरपाडा प्रकल्पाच्या कामास गती देण्यासाठी प्रयत्न करणार : डमाळे

तांदूळवाडी येथे बैठक संपन्न

 येवला :  प्रतिनिधी
तालुक्यातील उत्तर-पूर्व भागाला शेती व पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरणार्‍या मांजरपाडा प्रकल्पातुन पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहच कालव्याच्या अपूर्ण कामास गती देण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन भाजपा नेते बाबा डमाळे यांनी केले.
डोंगरगाव पोहच कालव्याच्या लाभार्थी शेतकर्‍यांची प्रातिनिधीक बैठक जेष्ठ नेते विठ्ठलराव शेलार यांच्या अध्यक्षतेखाली तांदूळवाडी फाटा येथे संपन्न झाली. याप्रसंगी डमाळे पुढे बोलतांना म्हणाले की, मांजरपाडा प्रकल्प ९० टक्के पूर्ण आहे. परंतु तांत्रिक अडचणीमुळे काम बंद आहे. मात्र, १० नोव्हेंबर २०१७ रोजी उर्ध्व गोदावरी प्रकल्पांतर्गत ९१७ कोटी रुपयांच्या कामास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. त्यामुळे हा प्रकल्प पुर्णत्वाकरीता दसरा-दिवाळी दरम्यान काम सुरु होईल, अशी अपेक्षा डमाळे यांनी व्यक्त केली.
पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव कालव्याचे अस्तरीकरण महत्वाचे आहे. त्यामुळे ३५८ दश लक्ष घन फुट हक्काचे पाणी मिळणार आहे. त्यामुळे कालव्याच्या लाभक्षेत्रातील संपूर्ण बंधारे पाण्याने भरुन मिळणार आहे. याकरीता मांजरपाड्याचा अर्धवट बोगदा पूर्ण झाल्यास पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहच पाणी आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे पाठपुरावा करावा लागणार आहे. याकरीता लाभक्षेत्रातील शेतकरी व जेष्ठ नेत्यांना बरोबर घेऊन आपण प्रयत्न करणार आहे, असे डमाळे म्हणाले.
याप्रसंगी जेष्ठ नेते विठ्ठलराव शेलार, तात्यासाहेब लहरे, दौलतराव ठाकरे आदींच्या भाषणात पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहच कालव्या वरती पुढार्‍यांनी निवडणुका जिंकल्या. हा प्रश्‍न प्रलंबित ठेऊन जनतेला झुलत ठेवले. हा प्रश्‍न पूर्णत्वास नेण्याकरीता प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले. या कामासाठी आम्ही आपल्याबरोबर लढा उभारण्यास तयार असल्याचे  त्यांनी सांगितले. याप्रसंगी जेष्ठ नेते सर्वश्री श्रीराम शिंदे, देवचंद गायकवाड, सोपानराव सैद, बाळासाहेब काळे, भिमाजी शिंदे, बालाजी जाधव, भाऊसाहेब पडवळ, गणपत पिंगट, छगन बागुल, रोहित पडवळ, जनार्दन कोंढरे, महेश काळे, तेजस कळसकर, दिपक पडवळ, आदित्य शिरसाठ यांच्यासह परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी व युवक वर्ग उपस्थित होता. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापुसाहेब पडवळ यांनी तर सुत्रसंचालन नवनाथ शिंदे यांनी केले.

थोडे नवीन जरा जुने