मेळाच्या बंधार्‍यासाठी ग्रामस्थ बेमुदत उपोषणास बसणार

येवला - गेल्या ५० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ममदापूर गावाजवळील मेळाच्या बंधार्‍यासाठी सात गावांचे ग्रामस्थ एकवटले आहेत. वनविभागाच्या हद्दीत बंधार्‍याची ज्या ठिकाणी जागा प्रस्तावित आहे. त्याच ठिकाणी जंगलात १८ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणाचा इशारा जिल्हाधिकार्‍यांना ग्रामस्थांनी दिला आहे.
ममदापूर गावाच्या उत्तरेला वनविभागाच्या जंगलात मेळाच्या बंधार्‍याची प्रस्तावित जागा आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील डोंगराळ पट्ट्यात येणारी ममदापूरसह राजापूर, खरवंडी, देवदरी, कोळगाव, रहाडी व रेंडाळे या सात गावांचा पाणी प्रश्‍न या बंधार्‍यावर अवलंबून आहे. वनविभागाच्या जंगलात वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी एकीकडे तळी आहेत, मात्र पाण्याची सोयच नसल्याने या वन्यप्राण्यांचीही गावांकडे भटकंती सुरू असते. मेळाचा बंधारा झाल्यास वन्यप्राण्यांसह सातही गावांमधील शेतीसिंचनासह पिण्याचे पाणी, जनावरांचा पाणी प्रश्‍नही सुटणार आहे. सदर बंधार्‍याबाबत संबंधित खात्याचे अधिकारी, मंत्री व लोकप्रतिनिधींना वेळोवेळी निवेदने व आंदोलने करूनही हा पाणी प्रश्‍न आजपावेतो सुटलेला नाही. निवेदनावर बाळासाहेब उगले, प्रकाश गोराणे, बाळासाहेब जाधव, संजय कांदळकर, अरुण साबळे, बापू केटे, माधव उगले, कारभारी गडरे, नाना उगले, शांताराम सदगीर, सागर वाघ, प्रकाश वणसे, धर्मा वैद्य आदींसह शेकडो ग्रामस्थांच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रती पालकमंत्री छगन भुजबळांसह वनमंत्री पतंगराव कदम, खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, समीर भुजबळ व विभागीय वनाधिकार्‍यांना पाठविण्यात आल्या आहेत.
भुजबळांनी सन २००४ मध्ये पहिली विधानसभा निवडणूक येवल्यातून लढवली तेव्हा निवडणुकीवेळच्या जाहीरनाम्यात मेळा बंधार्‍याचे काम पूर्ण करण्याचे वचन दिले होते. आज ८ वर्षे होऊनही भुजबळांनी दिलेला शब्द पाळला नाही. वनविभागाच्या अडचणीचे तुणतुणे वाजविले जात असून या सात गावांमधील मतदारांचा भ्रमनिरास झाला आहे.
दत्तात्रय वैद्य, सामाजिक कार्यकर्ता

थोडे नवीन जरा जुने