.पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास उपोषण

येवला  - येथील नांदगाव रोड परिसरातील नागरिकांना पालिकेकडून नळाद्वारे पाणीपुरवठा होत नाही, याबाबत संबंधित नगरसेवक व पाणीपुरवठा प्रमुख यांना सांगूनही उडवा-उडवीची उत्तरे मिळत असल्याने आठ दिवसात या परिसरात सुरळीत पाणीपुरवठा न झाल्यास नागरिक पालिका कार्यालयासमोर उपोषणास बसतील, असा इशारा अन्याय, भ्रष्टाचार निवारण जनहित समितीच्यावतीने नगराध्यक्ष नीलेश पटेल यांनी दिलेल्या निवेदनात दिला आहे.

निवेदनात म्हटले की, नांदगाव रोडवरील पाईपलाईनला मधूनच फोडून निलक गल्ली येथे जोडण्यात आली. त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या नळांना पाणी येणे बंद झाले आहे. याबाबत पालिकेचे पाणीपुरवठा प्रमुख तसेच नगरसेवकांना सांगितले. मात्र उडवा-उडवीची उत्तरे दिली गेली. परिसरातील नागरिकांना पाणी मिळण्यासाठी आपण स्वत: प्रयत्न करावे, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर राजू भालेराव, शंकर गुजर, तब्बसुम अन्सारी, कौसर शेख, रुक्साना अरिफ शेख, करिमा युसाबू, इक्बाल, अनिस शेख, संतोष भावसार, बाळासाहेब सोमवंशी, हुसेन अन्सारी, अशोक जाधव, प्रमोद पोळ, विष्णू निकम, संजय सस्कर, संतोष महाले, कैलास आरखडे, कल्पना पराते, संगीता परदेशी, नीता भागवत, रामदास जेठार आदींसह अनेकांच्या स्वाक्षर्‍या आहेत
थोडे नवीन जरा जुने