पिण्याच्या पाण्यासाठी पुरणगावकरांनी नळपाणीपुरवठा योजनेचा वॉशपंप फोडला

येवला    - १६ मार्च रोजी तालुक्यातील जळगाव नेवूरजवळील शिंदे वस्तीजवळ ३८ गावनळपाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीचा व्हॉल्व अज्ञात इसमांनी तोडल्यानंतर आज पुरणगावात पुन्हा ३८ गाव नळपाणीपुरवठा योजनेचा वॉशपंप फोडल्याची घटना उघडकीस आली. पिण्याच्या पाण्याची भीषण पाणीटंचाई तालुक्यात निर्माण झालेली असून ग्रामस्थ पाण्यासाठी टाहो फोडत आहेत.
पुरणगावातील गाय नदीतून जाणारी ३८ गावनळपाणीपुरवठा योजनेचा वॉशपंप आहे. नळपाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी स्वच्छ करण्यासाठी या ठिकाणी वॉशपंप ठेवण्यात आला आहे. पुरणगावाला भीषण पाणीटंचाई जाणवत असून पाणी टँकरने पाण्याचा पुरवठा केला जातो. गेल्या ५-६ दिवसांपासून गावात टँकरच न आल्याने गावाच्या घशालाच कोरड पडली होती.
पुरणगावचा समावेश पालखेड डावा कालव्याच्या लाभक्षेत्रात येणार्‍या आरक्षित बंधार्‍यामध्ये आहे. पुरणगावचा आरक्षित बंधारा भरून देण्यात यावा यासाठी ७ मार्च रोजी पुरणगावकरांनी येवला-नाशिक राज्य महामार्गावर रस्ता रोको केला होता. ५ मार्च रोजी पालखेडला सुटलेल्या पिण्याच्या पाणी आवर्तनातून आरक्षित बंधारा भरून द्यावा, अशी पुरणगावकरांची मागणी होती. परंतु आरक्षित बंधारा भरून न देता प्रशासनाने पाणी टँकरवर पुरणगावकरांना पाने पुसली होती. ८ मार्च रोजी पुरणगावला पाणी टँकर सुरू करून ९ मार्च रोजी पाणी टँकर गावात आला. गेल्या ५-६ दिवसांपासून गावात टँकरच न आल्याने ग्रामस्थ संतप्त होते. पुरणगावाजवळून जाणार्‍या ३८ गाव नळपाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीचा वॉशपंप काल रविवारी, दुपारी ३ वाजता जाऊन ग्रामस्थांनी फोडला. जलवाहिनीत पाइप टाकून या पाइपला ग्रामस्थांनी पाण्यासाठी तोटी बसवत आपली तहान भागवायला सुरुवात केली.
३८ गावनळपाणीपुरवठा योजना समितीचे अध्यक्ष सचिन कळमकर, उपाध्यक्ष मोहन शेलार, व्यवस्थापक उत्तम घुले यांनी आज सकाळी ११ वाजता पुरणगावात जाऊन जलवाहिनीची पाहणी केली. यावेळी समिती पदाधिकार्‍यांनी पुरणगावकरांनी लावलेली पाइपलाइन व तोटी काढून घेत याठिकाणचा वॉशपंप पुन्हा जागेवर बसविला. समितीने पुरणगावात जाऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी ग्रामस्थांनी गावात प्रशासनाने टँकर सुरू करूनही सहा दिवसांपासून गावाला पाणी नाही. प्यायला पाणीच नसल्याने आम्ही कुठे जावे, असा सवालच ग्रामस्थांनी समिती पदाधिकार्‍यांना केला. दरम्यान, ३८ गाव नळपाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी फोडण्याची दुसरी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
३८ गाव नळपाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी फोडण्याचा प्रकार कुणीही करू नये, कायदेशीर कारवाई संबंधितांवर केली जाईल. गळतीचे पाणी वापरण्यास आमची हरकत नाही. पुरणगावकरांमुळे जळगाव, नेवरगाव, मानोरी बुद्रुक व देशमाने गावांचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे.
- मोहन शेलार, उपाध्यक्ष, ३८ गाव नळपाणीपुरवठा योजना समिती
थोडे नवीन जरा जुने