भारनियमनाविरोधात येवल्यात उपोषण

येवला- शहरातील अर्ध्या भागात ठरावीक ग्राहकांकडे थकबाकी असूनही जबरदस्तीने व रात्रीचे भारनियमन सुरू आहे. ऐन परीक्षाकाळातील हे भारनियमन बंद करावे या मागणीसाठी शिवसेनेने काल येथे ‘महावितरण’च्या कार्यालयापुढे लाक्षणिक उपोषण केले.
शहराच्या भाग दोनमध्ये भारनियमन होत नाही, मात्र भाग एकमध्ये अर्ध्या शहराचा भाग दररोज सकाळी व सायंकाळी अंधारात डुबत आहे. वास्तविक ज्या भागात भारनियमन केले जाते त्या ठिकाणच्या ८० ते ८५ टक्क्यांपर्यंत ग्राहकांनी बिले वेळेत भरली आहेत. मात्र बिले न भरणार्‍या १५ ते २० टक्के ग्राहकांना शिक्षा देण्यासाठी उर्वरित ८० टक्के बिल भरणार्‍या ग्राहकांना वेठीस धरणे अयोग्य असल्याची भूमिका कार्यकर्त्यांनी यावेळी मांडली. ‘महावितरण’ने थकबाकीदारांवर कारवाई करून वसुलीची मोहीम राबवावी, इतरांना अंधारात ठेवू नये अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात विद्यार्थी सेनेचे तालुकाप्रमुख रूपेश लोणारी, ज्येष्ठ शिवसैनिक धीरज परदेशी, महेश सरोदे, दीपक भराणे, दीपक काथवटे, दीपक परदेशी, गुरुप्रितसिंग, रशीद शेख, राहुल शिंदे, नितीन जाधव, अशोक मोहारे, रावसाहेब नागरे आदींनी सहभाग घेतला होता. सुमारे तीन तास लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
दरम्यान ‘महावितरण’चे येथील कनिष्ठ अभियंता अली शहा यांनी उपोषणकर्त्यांना लेखी आश्‍वासन दिले आहे. १५ दिवसांपर्यंत भाग एकमधील वीजबिल वसुली ९० टक्क्यांपर्यंत करण्याचा प्रयत्न आहे. यानंतरच भारनियमन कमी करत नियमित बिल भरणार्‍या ग्राहकांवर अन्याय होणार नाही यासाठी काळजी घेण्याचे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले.
थोडे नवीन जरा जुने