पालखेड कालव्यातील चोरीमुळे येवल्यात पोचेना पाणी

येवला - पालखेड डाव्या कालव्यात खुलेआम वीजपंप टाकून पाणीचोरी होत असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडूनही येथे पाणी पोहोचू शकलेले नाही. ठरल्याप्रमाणे येथील टप्पा क्रमांक दोनच्या साठवण तलावात पाणी न आल्याने हा तलाव पूर्णतः कोरडा पडला आहे. शहराला पुरवायला पाणीच राहिलेले नाही. यामुळे काही भागात सात दिवस उलटूनही पाणीपुरवठा झालेला नाही.

येवला व मनमाडच्या पाणीयोजनांचे साठवण तलाव भरून देण्यासाठी पालखेड डाव्या कालव्याला मंगळवारी (ता. 5) पाणी सोडण्यात आले. अगोदर मनमाडसाठी पाटोद्याचा तलाव, नंतर येवल्याचे दोन्ही तलाव या पाण्याने भरण्यात येणार होते. पण पाटबंधारे विभागाच्या आशीर्वादामुळे रात्रभर वीजपंप टाकून, तसेच तलावातील डोंगळ्यातून पाणीचोरी झाल्याने पाटोद्याचा (मनमाड) तलाव अर्धाही भरला नाही. यामुळे पाणी सुटलेले असतानाही येवलेकर मात्र "पाण्याशिवाय' आहेत. काही भागात तर सात दिवस उलटूनही पाणी न आल्याने आज टॅंकरने पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती
आज पाणी अत्यल्प प्रवाहाने येत असल्याची चर्चा झाल्यानंतर तहसीलदार हरीश सोनार यांनी अधिकाऱ्यांसह सकाळी कालव्याची पाहणी केली. पाणीचोरीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसही पहारा देत होते. येथील नगराध्यक्ष व नगरसेवकांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन तत्काळ पाणी देण्याची मागणी केली आहे. पाणीच मिळत नसल्याने शहरात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांनी आंदोलनाचे हत्यार हाती घेतले आहे. सात दिवसांपासून शहरवासीयांना पाणीच मिळाले नसल्याने शहरात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाले आहे. शहर व परिसरातील विहिरी व कूपनलिकाही कोरड्या पडल्या आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी शहरात महिलांची भटकंती सुरू झाली आहे. सामाजिक संस्था व संघटनांनी टॅंकरद्वारा वॉर्डावॉर्डांत पाणीपुरवठा सुरू केला आहे. पाणीटंचाई संपुष्टात आणण्यासाठी त्वरित पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तन द्यावे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा नगराध्यक्ष नीलेश पटेल, उपनगराध्यक्ष भारती जगताप, व सर्व नागरिकांनी केले आहे.

अधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनी बंद
पालखेड डाव्या कालव्याला पाणी सुटल्यानंतर कालव्यावर वीजपंप बसविण्यात येऊन पाण्याची सर्रासपणे चोरी सुरू आहे. याबाबत तक्रार करावी तर पाटबंधारे विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी आपले भ्रमणध्वनी बंद ठेवल्याचे दिसून आले. मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारा पाटोदा येथील साठवण तलावात कालपासून पालखेड डावा कालव्यातून पाणी भरण्यात येते. पण पाणीचोरीमुळे पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने तलाव अर्धाही झालेला नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाने दुष्काळ पाहता "माणुसकी' जपावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शहरात आज टॅंकर, गाड्यांत ड्रम भरून पाण्याची शोधाशोध सुरू होती. उद्यापर्यंत पाणी तलावात न आल्यास स्थिती गंभीर बनणार आहे. दै.सकाळवरून साभार
थोडे नवीन जरा जुने