पालकमंत्री येणार म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याने कॉक्रीट रस्तावरील उघडे गज झाकले मुरुमाने.........

येवला - बारामती नंतर विकासाचे मॉडेल ठरविला गेलेला येवला तालुका
वास्तवात कसा आहे हे शहरातील महत्वाच्या भागातून जाणारा रस्ता पाहील्यावर
लक्षात येते. या रस्त्याने येणारे जाणारे राज्यभरातून येवल्यात
शिकण्यासाठी आलेले विद्यार्थी या विकासाच्या मॉडेलचा चांगलाच अनुभव घेत
असून त्यामुळे खुद्द साबां मंत्र्यांच्याच मतदारसंघातील साबां खात्याचे
अक्षम्य दुर्लक्ष चर्चेचा नव्हे तर चिंतनाचा विषय ठरलेला आहे. विशेष
म्हणजे या भागात राहणारे नोकरदार वर्ग असल्याने ते तक्रारीच्या भानगडीत न
पडता निमुटपणे त्रास सहन करीत आहे.
शहरातील कॉलनी भागात जाणारा पारेगाव रस्ता या कॉंक्रीट च्या रस्त्यांवरील
खड्डे बुजवण्यासाठी केलेली कच्ची मुरूमपट्टी नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत
आहे. रस्त्यात झालेल्या या खड्यांना बुजवण्यासाठी वापरलेली माती ऊडून
वाहन चालकांचे मेक-अप करत आहे. कॉक्रीटच्या रस्त्याचे खड्डे
बुजवीण्यासाठी मातीमिश्रीत मुरुम वापरल्याने आश्टर्य व्यक्त केले जात
आहे. साईसिध्दी हॉस्पिटलसमोरील या डांबरी रस्त्यावरील पडलेला खड्डा
हासुध्दा मातीमिश्रीत मुरुम वापरून बुजवण्याचा केविलवाणा प्रयत्न साबां
खात्याने केला आहे.
कोपरगांव मालेगाव महामार्गाला मिळणारा येवला पारेगांव रस्ता हा शहरातील
गोविंदनगर, साई बिल्डर्स, बाजीराव नगर, संभाजीनगर,समर्थनगर , श्रीराम
कॉलनी,श्रीकृष्ण कॉलनी,म.फुलेकॉलनी , छत्रपतीनगर या भागाना शहराशी
जोडणारा एकमेव रस्ता आहे. जि.प कडून सा.बां खात्याकडे वर्ग झालेल्या या
रस्त्याचा महामार्गाला जोडणारा १०० मीटरच्या आसपास रस्ता हा कॉक्रीटीकरण
केलेला होता निकृष्ट दर्जामुळे सदरच्या कॉक्रीट उघडून त्यातील गज बाहेर
आलेले आहे. वाहन धारकांना खड्ड्याबरोबर गज ही पाहून वाहने चालवण्याची
कसरत करावी लागते. या भागात महाराष्ट्रातील अनेक भागातून आलेले शेकडो
विद्यार्थी राहतात. तसेच १००० च्या आसपास कुटुंब राहतात. स्वामी समर्थ
केंद्रात दर्शनाला येणारे हजारो नागरिक , याभागात असलेले तीन महत्वाचे
हॉस्पिटल्स मध्ये येणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक या बरोबर तालुक्यातील
पारेगाव , निमगाव तसेच कोपरगाव तालुक्यातून येवल्याकडे येण्याचा जवळचा
मार्ग हा रस्ता असल्याने येथे कायम वर्दळ असते.
या रस्त्याचे उघडे पडलेले गजामुळे वाहने पंचर होणे, पायाला दुखापत होणे
असे अनेक प्रकार घडलेले आहेत. तालुक्यात सर्वत्र रस्ते सुस्थितीत
असल्याचा दावा केला जात असला तरी राज्या च्या कानाकोपऱ्यातून शिक्षणासाठी
आलेले विद्यार्थी राहत असलेल्या या भागातील हा रस्ता त्याला अपवाद आहे.
या रस्त्यावरील खड्डे बुजवीण्यासाठी टाकलेल्या मुरुमामध्ये काही मोठे दगड
असल्यामुळे गजाबरोबर नवीनच अडचण उद्भवली. या दगडांमुळे वाहनधारकांसह तसेच
पायी चालणार्‍या नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ना.भुजबळ साहेब या भागातील बाजीरावनगर येथील पाण्याच्या टाकीचे उद्घाटन
करण्यासाठी येणार असल्याची चर्चा असल्याने येथील खड्डे त्यांना दिसू नये
म्हणून सा.बां खात्याने घाईने बुजवल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.
हा रस्ता शहरी हद्दीत असला तरी तो नगरपालिकेच्या अखत्यारीत नाही ही बाब
सामान्य जनतेला माहित नसल्याने ते याबाबत नगरपालिकेलाच दोष देत आहे.
याबाबत सा.बां खात्याचे येवला उपविभाग २ चे सहाय्यक अभियंता एस.पी पाटील
यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधला असता ते म्हणाले कि हा रस्ता आत्ताच
रस्ते विकास योजने अंतर्गत जि.प कडून सा.बां कडे वर्ग झालेला असून
त्यातील कर्मचारी व प्रशासकीय हस्तांतरण प्रक्रिया चालू आहे. ते म्हणाले
हा रस्ता केंद्रिय निधी मध्ये प्रस्तावित कामे मध्ये घेतलेला असुन
केंद्राकडे तसा प्रस्ताव पाठवलेला आहे. लवकरच त्याची प्रक्रिया पुर्ण
होईल. मुरुमाबाबत ते म्हणाले कि ही तात्पुरती केलेली असून महिन्याभरात
रस्त्याचे काम निमगाव पर्यंत होईल.
थोडे नवीन जरा जुने