ना.छगन भुजबळ लोकसभेला जाणार नाही येवल्यातील जाणकारांचा विश्वास

येवला (अविनाश पाटील)
राष्ट्रवादी काँग्रेसने छगन भुजबळ यांना लोकसभेची उमेदवारी दिल्याची
घोषणा झाल्यानंतर, येवला विधानसभा मतदार संघात नाराजीचे वातावरण पसरलेले
आहे.गेल्या १० वर्षापासून येवला मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत असलेल्या
छगन भुजबळांना ज्येष्ठ नेत्यांना दिल्लीच्या राजकारणात पाठविण्याचे
धोरणाच्या नावाखाली येवल्यातून बाहेर नेले ते कशासाठी असा प्रश्न भुजबळ
समर्थकांना पडला आहे. याबाबत येवला निधानसभा मतदार संघातील राजकीय
वर्तुळात आता शंका कुशंका व चर्चेला ऊत आला आहे.
मोठ्या भुजबळानंतर येवला मतदारसंघात कोणते भुजबळ अशा चर्चांना उत आला
आहे. समीर भुजबळ हेच येवला मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतील अश्या
शक्यतेमुळे मोठ्या भुजबळांच्या समर्थकांचे धाबे दणाणले आहे. समीर भुजबळ
यांच्याकडे कोणत्याही प्रकारची चापुलसकी चालणार नाही. त्यांचे कडक व
रोखठोक भुमिका या समर्थकांना पेलवणार नाही. समीर भुजबळ यांची रोखठोक
कार्यप्रणालीचा अनुभव पाहता फक्त छगन भुजबळ येवल्यात आल्यावर त्यांच्या
मागेपुढे करणाऱ्या कार्यकर्त्यांना आपल्या दुकानदारीची चिंता भेडसावत
आहे.
यापुर्वी संपर्क कार्यालयामध्ये असणारी नेहमीची गर्दी आता फक्त छगन
भुजबळ यांच्या येवला दौऱ्याच्या वेळी दिसून येत असे. भुजबळ साहेब आज
येणार असे समजताच त्यांचे मागेपुढे मिरवण्यासाठी अनेक स्वयंघोषीत
पुढारीची गर्दी संपर्क कार्यालयात दिसत असे. समता परिषदेच्या माध्यमातून
येवल्यातील इत्यंभूत माहिती असलेल्या समीर भुजबळांपुढे आपला निभाव कसा
लागणार याची चिंता पडलेले आता छगन भुजबळ येवल्यातूनच उमेदवारी करावी
यासाठी कंबर कसण्याची तयारी करीत आहे. समीर भुजबळांकडे येवल्याची सुत्रे
गेल्यास वर्षानुवर्षे राष्ट्रवादीचे पदे उपभोगणारेची पदे जाऊ शकतात.
प्रत्यक्ष छगन भुजबळ तालुक्याचे प्रतिनिधी असल्याने जनतेच्या प्रश्नी या
तथाकथीत नेत्यांची कोणतीही भूमिका नव्हती. कोणत्याही प्रश्नी परिणामाची
तमा न बाळगता सडेतोड भुमिका मांडणारे माणिकराव शिंदे व जनतेच्या कामासाठी
थेट आंदोलनाची भुमिका घेणारे संभाजी पवार वगळता कोणत्याही
राष्ट्रवादीच्या स्थानिक पुढाऱ्यांचे जनतेसाठी काहीच योगदान दिसून येत
नाही.
छगन भुजबळ येवल्यातूनच उमेदवारी करणार लोकसभेला जाणार नाही असे
छातीठोकपणाने सांगणारे गुरुवारी राष्ट्रवादीची यादी जाहिर झाल्यावर सुतकी
चेहरे दाखवून फिरत होते. जनतेमध्ये छगन भुजबळांचे लाभार्थी असे नामकरण
असलेल्या या लाभार्थीच्या हालचाली जोरात सुरु झाल्या असल्या तरी
राजकारणाशी घेणेदेणे नसलेल्या जनतेला कोणताही का होईना पण सशक्त नेतृत्व
मिळणार असल्याने या निर्णयाने फरक पडलेला नाही.
तालुक्यातील जाणकारांच्या मते राष्ट्रवादीच्या उमेदवारी यादीत फारसे बदल
दिसत नाहीत. बहुतेक विद्यमान खासदारांनाच उमेदवारी दिली जात असताना केवळ
नाशिकमध्ये खासदार समीर भुजबळ यांच्याऐवजी छगन भुजबळ यांना उमेदवारी देऊन
राष्ट्रवादीने नेमका काय संदेश जनतेला दिला, हा प्रश्न केला जात आहे.
तसेच ऐनवेळी समीर भुजबळच लोकसभा लढवतील असा विश्वास तालुक्यातील जाणकार
नेते व्यक्त करीत आहे.छगन भुजबळ यांना येवला मतदारसंघात थेट विरोध करणारे
विरोधक कार्यरत नाही पण पक्षांतर्गत राजकीय विरोध सुप्त स्वरुपात आहे.
ज्या पाणी प्रश्नावर १० वर्षे येवला मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व छगन भुजबळ
यांनी केले तो अजून प्रश्न सुटलेला नाही. राजकीय कुरघोडी पोटी जलसंपदा
खात्याकडून अडवणुक होते हे जनतेला दिसून आले असल्याने यासाठी छगन भुजबळ
यांनी येवल्यातच रहावे असा सुर काही ठिकाणी दिसून येतो.
थोडे नवीन जरा जुने