पुणेगाव डोंगरगाव पोहच कालव्याची पूरपाण्याने चाचणी होणार ???



पुणेगाव डोंगरगाव पोहच कालव्याची पूरपाण्याने चाचणी होणार ???

येवला : प्रतिनिधी
माजी उपमुख्यमंत्री तथा येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांनी गत आठवडयात मतदार संघातील काही भागाचा दौरा केला होता. विखरणी येथे जनतेशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या होत्या त्यात पुणेगाव डोंगरगाव पोहच कालव्याची पूरपाण्याने चाचणी घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती त्या मागणीची तात्काळ दखल घेऊन चांगला पाऊस झाला तर पूरपाण्याने या कालव्याची चाचणी घेण्याचे छगन भुजबळ यांचे प्रयत्न आहेत त्यादृष्टीने चाचणीपूर्वी कालव्यातील अडथळे दूर करण्यात यावे अशी मागणी छगन भुजबळ यांनी पत्राद्वारे संबधित विभागाकडे केली असून त्यानुसार कालव्याच्या दुरुस्तीच्या कामाला तात्काळ सुरवात करण्यात आली आहे अशी माहीती छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे व पंचायत समितीचे सदस्य मोहन शेलार यांनी दिली आहे.
नांदूरमधमेश्वर प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याद्वारे येवला तालुक्यातील लाभक्षेत्रात येणाऱ्या गावांना कालव्याद्वारे पाणी सोडण्याचे प्रस्तावित आहे. मात्र सदर कालव्याची पाहणी केली असता या कालव्यात मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढली असून पूरपाणी सोडल्यास पाण्याच्या प्रवाहाला अडथळा येऊ शकतो. तसेच या कालव्यात मोठमोठे दगड,व माती साठली असून त्यामुळे पाण्याचा वेग कमी होऊ शकतो तसेच या मोठमोठ्या अडथल्यामधून पाणी पुढे जाऊ शकणार नाही. तरी सदर कालवा स्वच्छतेबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी अशी मागणीही या पत्रान्वये भुजबळ यांनी केली होती.कालवा प्रशासनाने या पत्राची तात्काळ दखल घेत कालवा साफसफाईला सुरवात केली असून पुणेगाव ते दरसवाडी या ६३ कि मी अंतरापैकी २८ ते ६३ कि मी दरम्यान कालव्यातील अडथळे तसेच साफसफाईचे काम सुरु करण्यात आले असून दरसवाडी ते बाळापुर दरम्यान काम सुरु करण्याच्या सूचनाही संबधित विभागाला देण्यात आल्या असल्याची माहितीही मोहन शेलार यांनी दिली आहे.गत वर्षी कालव्याची चाचणी घेण्यात यावी या मागणीसाठी मोहन शेलार यांच्यासह नागरीक कालव्यावरच उपोषणाला बसले होते. उपोषणाची दखल घेत चाचणीला सुरवात झाली होती मात्र दुदैवाने पाउस थांबल्याने व काही ठिकाणी कालवा फोडण्यात आल्याने चाचणी पूर्ण होऊ शकली नव्हती. त्या वेळी छगन भुजबळ तुरुंगात नसते तर चाचणी पूर्ण झाली असती अशी त्या भागातील शेतकऱ्यांची भावना आहे. आता छगन भुजबळ स्वत सक्रीय झाल्याने पुणेगाव आणि दरसवाडी धरण ओव्हरफ्लो झाले तर या वेळेस कालव्याची चाचणी पूर्ण होणारच असा आशावाद लाभक्षेत्रातील जनतेला वाटत आहे
थोडे नवीन जरा जुने