नव्याने कर्जपुरवठा करा सुभाष निकम यांची मागणी

नगरसूल- दुष्काळामुळे शेतकर्‍यांचे संपूर्ण कर्ज माफ करून नव्याने कर्ज पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी पणन महासंघाचे पुणे संघ सुभाष निकम यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

येवला तालुक्यात व तालुक्याच्या इतर पूर्व भागात कधी नव्हे एवढा मोठा दुष्काळ पडला आहे. सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक कचाटय़ात सापडला आहे. बँका, पतसंस्था, सावकार, तसेच अनेक सहकारी सोसायटय़ांकडून घेतलेल्या कर्जावर कशीबशी शेती कमी होती; परंतु लहरी बेभरवशाच्या अशा पावसामुळे पाऊसच झाला नसल्याने शेतातील उभे पिक पाण्याअभावी करपुन गेले होते. त्यामुळे शेतकरी कोणत्याच प्रकारचे कर्ज भरू शकणार नाही.

त्यामुळे शेतकर्‍यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, अशी मागणी निकम यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडे केली आहे. याबद्दल लवकरच शेतकर्‍यांचा कर्जमुक्ती मेळावा होणार असून, शासन दरबारी न्याय मिळविण्यासाठी शेतकरी आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
थोडे नवीन जरा जुने