महिकोचे बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी

येवला - मागील वर्षी बियाणे वाटपाच्या वेळी झालेला लाठीमार राज्यभर गाजलेला असताना देखील
 महिको कंपनीचे कापूस बियाणे एम.आर.सी. ७३५१ व डॉ. ब्रेन्ट ४३४७ उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार हरीष सोनार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तालुक्यामध्ये कांदा, मका, कपाशी, बाजरी या पिकांचे उत्पादन घेतले जाते. लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. गेल्या ५-६ वर्षांपासून तालुक्यातील शेतकरी महिको कंपनीचे एम.आर.सी. ७३५२, चैतन्य ७३७७ व डॉ. ब्रेन्ट ४३४७ या वाणाची लागवड करीत आहेत. शासनाने महिको कंपनीस कपाशी बियाणे विक्रीवर महाराष्ट्रात बंदी घातली आहे. इतर राज्यात मात्र बियाणे मुबलक उपलब्ध आहे. सदर बियाणे महाराष्ट्रात उपलब्ध करून द्यावे, वाणावरील विक्री बंदी त्वरित उठवून शेतकर्‍यांना वेळेत कपाशी बियाणे उपलब्ध करून द्यावे, अन्यथा शेतकरी संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन उभारावे लागेल, असा इशारा निवेदनात दिला आहे. निवेदनावर संतू पाटील झांबरे, बाळासाहेब दौंडे, संजय पगारे, सूर्यभान गायकवाड, चंद्रभान मोराडे, योगेश ठोंबरे, प्रभाकर निकम, अरुण जाधव, बद्रीनाथ कोल्हे, रामचंद्र घोडके, संजय जगझाप आदींसह अनेकांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

दरम्यान या मागणीच्या मागे येवला येथील व्यापारी वर्ग असल्याची भावना जाणकार शेतकरी व्यक्त करीत आहे. इतर कंपन्याचे चांगले बियाणे उपलब्ध असताना एकाच कंपनीचा गवगवा कशाला ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला असून शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता विचार करण्याची गरज आहे असे मत काही शेतकरी व्यक्त करीत आहे.
थोडे नवीन जरा जुने