मित्रप्रेमापोटी रमजाननिमित्त 18 हिंदू तरुणांनी धरला रोजा

येवला तालुक्यातील सायगाव येथील बशीर शेख यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांच्या मुंजोबा मित्र परिवारातील हिंदू मित्रांनी एक दिवस कडकडीत रोजा धरून हिंदू-मुस्लिम एकतेचा आदर्श घालून दिला. 
सायगाव येथील ज्येष्ठ समाजसेवक बशीरभाई शेख (65) यांचे गावातील आबालवृद्धांशी मैत्रिपूर्ण संबंध आहेत. शिवजयंती डॉ. आंबेडकर, महात्मा फुले, अण्णा भाऊ साठे यांची जयंती, पुण्यतिथी असो अथवा गणेशोत्सवात ते उत्स्फूर्त सहभाग नोंदवतात. दिवाळीनिमित्त आदिवासी, शेतमजुरांना फराळ वाटप, अपघातग्रस्तांना मदत, रक्तदान शिबिर आदी उपक्रम राबवून जातीयतेच्या सर्व चौकटी मोडून ते नेहमी समाजकार्यात अग्रेसर राहतात. गत रमजानमध्ये भाईंच्या कार्याची दखल घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या घरी येऊन समजानच्या शुभेच्छा दिल्या होत्या. 
यंदा बशीरभाई आमचे बंधू, या भावनेतून माजी सरपंच भागूनाथ उशीर, सुनील देशमुख, भास्करराव गायकवाड, संजय देशमुख, अनंत गाडेकर, संजय मिस्तरी, शरद लोहकरे, अनिल आरोटे, सर्जेराव उशीर, बाबा बारे, बाळू उशीर, दत्तू कुळधर, बंडू निघुर, हर्षद देशमुख, अरविंद उशीर, गणेश उशीर, गुलाब उशीर आदींनी रोजाचा उपवास धरला. मित्र परिवार पहाटे 4 वाजता एकत्र येऊन शहिरी करून उपवासास प्रारंभ केला. 
पावसासाठी प्रार्थना 
'एकादशी तसा रोजा' असा विचार मांडत श्रध्देने 15 तास अन्न पाण्याविना राहून सायंकाळी मुस्लिम बांधवांसमवेत फलाहार घेऊन उपवास सोडला. या प्रसंगी जकात, नमाज, रोजा आदी इस्लामच्या तत्त्वांवर चर्चा होऊन सर्वांनी चांगला पाऊस पडावा, यासाठी सामुदायिक प्रार्थना केली. अमन शेख या सात वर्षीय मुलाने कडकडीत रोजा धरल्याबद्दल त्याचा या वेळी सत्कार करण्यात आला. 
थोडे नवीन जरा जुने