ग्रामीण भागानंतर आता येवला शहरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

ग्रामीण भागानंतर आता येवला शहरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
येवला : वार्ताहर
येवला तालुक्यातील ग्रामीण भागात सुरु असलेला भटक्या कुत्र्याचा हैदोस आता येवला शहरातही सुरु झाला आहे. या भटक्या कुत्र्यांच्या दहशतीने नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले असून शहरामध्ये मोकळे फिरणेही आता मुश्किल झाले आहे. शहरातील सोनार गल्ली भागात रविवारी सकाळी याच भटक्या कुत्र्यांनी ४ ते५ मुलांना चावा घेतला तसेच रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या सायकलस्वारांनाही त्यांनी सोडले नाही. विशेषतः लहान मुले व दुचाकीवाहनस्वार या कुत्र्यांचे लक्ष्य ठरत आहेत. तालुक्यात यापुर्वीही न्याहारखेडा व चिंचोंडी येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात अनेकांना जखमी व्हावे लागले होते. शहरातील नवसाहती व हुडको भागातही मागील महिन्यात कुत्र्यांनी नागरिकांना चावे घेतले होते.तर मातुळठाण येथील सरपंचाचाही भटके कुत्रे आडवे आल्याने दुचाकी घसरून मृत्यु झाला होता. शहरातील सोनार गल्ली येथील रहिवासी मानसी सोनार यांना या भटक्या कुत्र्यांचा चांगलाच त्रास होत आहे. त्यांच्याकडे घरकामासाठी येणाऱ्या महिलेला या कुत्र्यांनी चावा घेतल्याने त्यांच्याकडे कोणीही कामाला यायला तयार नाही. अशीच परिस्थितीला सोनार गल्लीमधील इतर गृहीणींनाही तोंड द्यावे लागत आहे. या गल्लीसह शहरात बाहेर वाळत घातलेले कपडे, चप्पला , बाहेर उभ्या असलेल्या गाडीचे सिट हे कुत्रे चावून चावून अक्षरक्षः फाडून टाकतात. या भटक्या कुत्र्यांकडून ओट्यावर अंगणात घाण करुन ठेवणे , बाहेरून घाणेरडे पदार्थ आणून ठेवणे अश्या प्रकाराला येवलेकरांना
तोंडद्यावे लागत आहे.येणाऱ्या - जाणाऱ्यांनाही दुचाकी वाहनांनाही कुत्र्यांची दहशत बसलेली असल्याने कुत्रे मागे लागल्यास जोरात वाहन पळवल्यानेही अपघात होऊ शकतो. सकाळी व रात्रीच्या वेळेस शहरातील पारेगाव
रस्त्यावरही कुत्रे वाहनांच्या मागे लागतात. यामुळे अनेकदा वाहनचालक घसरून पडलेले आहेत.
शहरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस असलेल्या ठिकाणी नगराध्यक्ष प्रदिप सोनवणे यांनी भेट देऊन पाहणी केली. या कुत्र्यांचे वास्तव्य असलेले ठिकाणे ही खाजगी पडीक जागा व झुडुपांचे असल्याचे सांगून त्या ठिकाणी
लवकरच साफसपाई करण्यात येईल असे सांगून लवकरच नगरपालिका प्रशासनातर्फे या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला जाईल असे त्यांनी सांगीतले. उघड्यावर वाया गेलेले खाद्यपदार्थ व कचरा फेकल्याने या कुत्र्यांना आयतेच खाद्य उपलब्ध होत असल्यानेही कुत्र्यांची संख्या वाढत असल्याने हे टाळावे असे आवाहनही नगराध्यक्ष प्रदिप सोनवणे यांनी केले.
भटक्या कुत्र्यांचे चावे घेण्याच्या वाढलेल्या प्रमाणाबाबत येवला तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालयाचे पशुवैद्यक डॉ.सतिष कुऱ्हे यांनी शहराच्या आसपासच्या पोल्ट्री व्यावसायिकांना जबाबदार धरले आहे. या व्यावसायिकांकडून मृत झालेले पक्षी हे उघड्यावर फेकून दिले जात असल्याने या कुत्र्यांना आयतेच खाद्य उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगीतले. जर व्यावसायीकांकडून मृत पक्षी हे व्यवस्थीतपणे जमिनीत पुरुन त्यांची विल्हेवाट लावली तरच हा प्रश्न सुटेल असेही ते म्हणाले. महानगरपालिका या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून कुत्र्यांची नसबंदी करतात त्यामुळे या कुत्र्यांच्या जन्मदरावर नियंत्रण ठेवता येते. जास्त प्रमाणात उपलब्ध असलेले खाद्य व नसबंदीची व्यवस्था नसल्याने एक एक कुत्रे वर्षातून ८ ते १० पिल्लांना जन्म देत आहे .त्यामुळे या वाढीव संख्येवर नियंत्रणासाठी कुत्र्यांची नसबंदी उपाययोजना येवला नगरपालिके राबविण्याची सुचनाही त्यांनी केली. कचरा डम्पींग ग्राऊंड हे शहरापासून १० किमी च्या वर अंतरावर असले आणि कचऱ्यांबाबत सतर्कता दाखवली तरच अश्या प्रकारांवर आळा बसू शकतो असेही डॉ.सतिष कुऱ्हे म्हणाले.
थोडे नवीन जरा जुने