भागवत सोनवणेंच्या पाठपुराव्याला पालकमंत्री महाजनांची साथ रहाडी च्या तलाव दुरुस्तीला २० लाख रुपयांचा निधी

भागवत सोनवणेंच्या पाठपुराव्याला पालकमंत्री महाजनांची साथ 
रहाडी च्या तलाव दुरुस्तीला २० लाख रुपयांचा निधी

येवला – प्रतिनिधी

तालुक्यातील रहाडी येथील बाळगंगा नदीवर फुटलेल्या  तलावाची धरणरेषा दुरूस्तीसाठी व  नव्याने सांडवा बांधण्यासाठी १९ लाख ८४ हजार ९१६ रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. जलहक्क संघर्ष समितीचे भागवत सोनवणे व गावातील नागरिकांनी जानेवारी २०१६ मध्ये ४८ तासांचे उपोषण करून हा प्रश्न ऐरणी वर आणला होता. यासंदर्भात पालकमंत्री गिरिष महाजन यांच्या जनता दरबारामध्येही गाऱ्हाणे मांडले गेले होते व त्याची दखल घेण्यात आली. 
लघु सिंचन जलसंधारण विभागा मार्फत निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून १५ दिवसात कार्यरंभ आदेश निघून कामास सुरुवात होणार आहे. रहाडी येथील हा तलाव १९७२ साली दुष्काळात बांधला होता, मात्र त्यानंतर पाचच वर्षात संपूर्ण तलाव फुटून वाहून गेला होता. १९८० नंतर आज पर्यंत या तलावात पाणीच अडले नव्हते.
जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत या तलावाची दुरुस्ती करावी यासाठी जलहक्क संघर्ष समितीचे भागवत सोनवणे व गावकरी मागणी करत होते. मात्र त्याला प्रतिसाद न  मिळाल्याने भागवत सोनवणे, जनार्दन गायकवाड, किरण कापसे, बाळु मोरे, दिपक गायकवाड, बाळासाहेब थोरात, अशोक जाधव, दिलीप सोनवणे या गावकर्यां सोबत येवला तहसील कार्यालयात उपोषण केले होते. लघु सिंचन जल संधारण व जिल्हाधिकारी नाशिक यांच्या लेखी आश्वसनांनंतरच उपोषण मागे घेण्यात आले. त्यांनतर ही गेली २ वर्षे सातत्याने आमदार छगन भुजबळ, आमदार जयंत जाधव यांच्या माध्यमातून विधीमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित केले होते.
मात्र  पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या जनता दरबारातही हा प्रश्न उपस्थित केला अन् त्यासाठी भागवत सोनवणे यांना साथ देण्यासाठी भाजपचे तालुकाध्यक्ष राजूसिंग परदेशी, शहराध्यक्ष आनंद शिंदे ,भाजप युवा कार्यकर्ते समिर समदडीया पुढे आले.  समिर समडदीया यांनी पालकमंत्री महोदयांकडे या प्रश्नी पाठपुरावा करीत भागवत सोनवणे यांनी मांडेल्या तांत्रिक बाबी पोहचवल्या त्यामुळे अखेर निधी मिळून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत आहे. यामुळे परिसरातील शेती सिंचनासाठी तसेच उन्हाळ्यात जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. 

******************
गावाच्या अगदी जवळ असलेल्या  तलावात पाणी अडल्याने दुष्काळ ग्रस्त रहाडी गावाचे रूपच बदलून जाणार आहे. अडलेल्या पाण्यातून पेय जल योजना राबविल्यास महिलांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी नाही. 
- भागवत सोनवणे
संयोजक जलहक्क संघर्ष समिती, येवला


थोडे नवीन जरा जुने