पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्या! दुष्काळ जाहीर करण्याची आमदार दराडेची मुख्यमंत्र्याकडे मागणी




पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्या!

दुष्काळ जाहीर करण्याची आमदार दराडेची मुख्यमंत्र्याकडे मागणी

 

येवला : प्रतिनिधी

ब्रिटिशकालीन दुष्काळी असलेल्या येवल्यासह नांदगाव तालुक्यात अद्यापही जोरदार पाऊस झालेला नाही सर्वच पिके हिरमुसली असून वाढ खुंटलेली आहे यामुळे खरिपाचे सत्तर टक्क्यांपर्यंत नुकसान होणार असून शेतकरी आर्थिक विवंचनेत अडकला आहे त्यामुळे पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून हे तालुके दुष्काळी जाहीर करावेत अशी मागणी आमदार नरेंद्र दराडे यांनी केली आहे.

आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दराडे,युवा नेते कुणाल दराडे,व्ही.एन.नाईक शिक्षण संस्थेचे संचालक प्रकाश घुगे,मकरंद तक्ते यांनी भेट घेऊन निवेदन दिले. तसेच या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्याची मागणी केली. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांसह दुष्कली येवला,नांदगाव तालुक्यात पावसाळा संपत आला तरी अद्यापही मुसळधार पाऊस झालेला नसल्याने विहिरी बंधारे नदी नाले कोरडे ठाक आहेत. त्यातच रिमझिम पावसावर घेतलेली खरिपाची पिके जगली पण ती देखील शेतात सांगाडे म्हणून उभे आहेत. उत्तर पूर्व भागात तसेच नांदगावच्याही डोंगरी भागातील मका,सोयाबिन,कपाशी या मुख्य पीकांची वाढ निम्म्याने खुंटली आहे.शेतात उभे असलेल्या सांगाड्यांचा जेमतेम दहा-वीस टक्के पीक येईल अशी स्थिती यापुढे पाऊस पडला तर आहे. अन्यथा या फिक्या पिकांवरही पाणी सोडण्याची वेळ येणार आहे. पाऊस पडेल या भरवशावर काही शेतकर्यांनी लाल कांदा लागवड देखील सुरु केली होती पण आता तर कडक उन पडल्याने हे पिक देखील मातीमोल होत असल्याचे दराडे यांनी म्हटले आहे.

शासकीय पर्जन्यमापकावर रिमझिम पावसामुळे आकडे फुगले आहेत.पण प्रत्यक्षात परिस्थिती अतिशय कठीण असून या आकड्यांवर पिकांच्या स्थितीचा अंदाज लावू नये. तर प्रत्यक्षात पिकांच्या नुकसानीचे यंत्रणेकडून पंचनामे करावेत आणि दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. पावसाच्या दुर्भीक्षामुळे पिण्याच्या पाण्याची तसेच शेतीची भयानक स्थिती निर्माण होऊन तालुक्यातील शेतकरी व जनता त्रस्त व हवालदिल झालेली आहे.सद्यस्थितीत ५० वर वाड्या-वस्त्यांना टँकरने पाणी पुरवठा होत असुन तो अपुरा पडत आहे.काही शेतकऱ्यांनी दुबारपेरण्याही वाया गेल्याने शेतकर्यां चे अतोनात नुकसान झालेले आहे. शेतीसाठी काढलेले कर्ज कसे फेडावे या विंवचनेत शेतकरी असतांनाच पिण्याच्या पाण्यासह गुरांच्या चार्यालचाही भिषण प्रश्नक निर्माण झालेला आहे. या तालुक्यातील भिषण दुष्काळ सदृष्य परिस्थितीची शासनाने तात्काळ पाहणी करुन शेतकरी व जनतेला दिलासा मिळावा यासाठी तालुका दुष्काळग्रस्त जाहिर करुन हे दुष्काळाचे सावट दुर व्हावे यासाठी आवश्यक त्या उपाययोजना व शेतकर्यांना आर्थिक कर्जातुन सावरण्यासाठी पुरेसा निधी मंजुर करावा.तसेच शेतकर्यां ना सरसकट कर्जमुक्त करावे अशी मागणी दराडे यांनी केली आहे.

फोटो

मुंबई : दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देतांना आमदार नरेंद्र दराडे,कुणाल दराडे आदि.



 
 
 

थोडे नवीन जरा जुने