अज्ञात समाजकंटकांकडून शेतकऱ्याच्या 25 एकरवरील मक्याच्या गंजीला आग

 🔥 अज्ञात समाजकंटकांकडून शेतकऱ्याच्या 25 एकरवरील मक्याच्या गंजीला आग; खर्डीसाठे येथील शेतकऱ्याचे दहा लाखांचे नुकसान

येवला :  अधिक माहितीसाठी पहा फक्त SK9 news by सुदर्शन खिल्लारे

येवला तालुक्यातील खर्डीसाठे या ठिकाणी अज्ञात समाजकंटकांनी केलेल्या भीषण कृत्यात एका शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पहाटेच्या सुमारास शेतकऱ्याच्या शेतात काढणी करून ठेवलेल्या मक्याच्या गंजीला (ढिगाला) आग लावल्याने अंदाजे ८०० क्विंटल मका जळून खाक झाला. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.


दहा लाखाहून अधिक रुपयांचे नुकसान

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, खर्डीसाठे येथील शेतकरी वाल्मीक नागरे यांनी आपल्या २५ एकर शेतातील मका काढणी करून शेतात गंजीच्या रूपात (ढिग) सुरक्षित ठेवला होता. मात्र, पहाटेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी ही गंजी पेटवून दिली. आगीची माहिती मिळताच शेतकरी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, आग इतकी भीषण होती की, त्यावर नियंत्रण मिळवण्यापूर्वीच संपूर्ण मक्याची गंजी जळून राख झाली.



या भीषण आगीमध्ये वाल्मीक नागरे यांचा अंदाजे ८०० क्विंटल मका जळून खाक झाला. बाजारभावाप्रमाणे या नुकसानीचा आकडा दहा लाखाहून अधिक रुपयांच्या घरात जात आहे. ऐन हातातोंडाशी आलेला घास या अज्ञात व्यक्तींच्या कृत्याने हिरावला गेल्यामुळे शेतकरी नागरे यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे.

ज्या समाजकंटकांनी हे कृत्य केले आहे, त्यांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर शासन करावे, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी वाल्मीक नागरे आणि खर्डीसाठे येथील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने