२७ मे रोजी कुसमाडी वनबंधार्‍याचा स्वप्नपूर्ती सोहळा आयोजन



२७ मे रोजी कुसमाडी वनबंधार्‍याचा स्वप्नपूर्ती सोहळा आयोजन

येवला : पुढारी वृत्तसेवा

गेल्या सव्वा महिन्यांपासून सुरू असलेल्या कुसमाडी वनबंधार्‍याचा गाळ 
काढण्याचा व दुरूस्तीचा या उन्हाळ्यातला टप्पा पूर्ण झाला आहे, त्यानिमीत्त येत्या २७ मे रोजी, कुसमाडी वनबंधारा स्वप्नपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मोती - गारदा नदी संवर्धन प्रकल्पाच्या वतिने अंकाई किल्ल्या समोरील सुळेश्वर डोंगरात उगम पावणार्‍या मोती नदीच्या सपूर्ण पाटलोट विकासाचा संकल्प करण्यात आला आहे. ७१ किलो मिटर वाहणारी गोदावरीची ही उपनदी आजवर तशी दुर्लक्षित राहिली होती. येवल्यातला हा सातमाळा डोंगर रांगेचा परिसर पूर्वी भरपूर वनराई व दाट झाडीचा प्रदेश म्हणून ओळखला जायचा, कालांतरानंतर तो उजाड झाला आणि त्या सोबतच इथले पर्जन्यमान तथा भूजलपातळीत कमालीची घट झाली. पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले तसे दुरे पिक दुरापास्त झाले. गेल्या काही वर्षात हवामानबदलाचे संकट गडद होत असताना परिसरातील जनता पाण्यावाचून बेहाल झाली होती, त्यामुळे इथले जीवनमान मंदावले होते.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमीत्त राज्य सरकारने महाराष्ट्रातील ७५ नद्या अमृतवाहिनी बनविण्यासाठी सुरू केलेल्या चला जाणूया नदीला अभियानात येवला तालुक्यातील मोती नदीचा समावेश केला. या अभियानाला चालना देण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा होता. ही गरज ओळखून शासनाने नियूक्त केलेले नदी प्रहरी मनोज साठे व प्रशांत परदेशी यांनी पाण्याच्या कामा विषयी तळमळ असलेल्या मित्रपरिवारास गोळा करून संपूर्ण नदीच्या पाणलोटात विकासाची गंगा आणण्याचा संकल्प केला. यासाठी मुंबईच्या मराठमोळं इनोव्हेशन्स संस्थेची मदत घेण्यात आली. राज्याचे अप्पर पोलिस महासंचालक डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांची सदिच्छादूत म्हणून नेमणूक करण्यात आली. दानशूरांकडून डिझेल, ट्रॅक्टर सेवा, जेसीबी, पोकलॅन सेवा मिळविण्यात आली. सव्वा महिना बंधार्‍यातून गाळ काढण्याचे काम सुरू होत. ७२च्या दुष्काळाच्या वेळी करण्यात आलेली बंधार्‍याची दगडमातीची भिंती गळती होत असल्याने पाणी धरत नव्हती. त्या भिंतीचेह दुरूस्तीचे काम घेण्यात आले. सव्वा महिन्यांच्या अथक मेहनतीत बंधार्‍याने विशाल रूप धारण केले. या बंधार्‍याच्या पाण्याचा उपयोग परिसरातील वन्यजीवांना होणार आहे. तसेच गाळ काढल्याने पाण्याचा भूगर्मात भरपूर झिरपा होण्यास मदत होईल व भूजलपातळी वाढण्यास मदत होणार आहे. या संपूर्ण कामात सहाय्य करणार्‍या ग्रामस्थ, दानशूर मंडळींचा या स्वप्नपूर्ती सोहळ्‌यात सत्कार करण्यात येणार आहे. डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांच्यासह कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिती सिंगल यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र भूषण चंदाताई तिवाडी यांचे नदीवरचे भारूड या प्रसंगी सादर होणार आहे. पाण्याच्या संवर्धनाचे एक मोठे काम लोकसहभागातून पूर्ण झाल्याने कुसमाडी पंचक्राशीत आनंदाचे वातावरण आहे. याकामाची प्रेरणा घेऊन इतर गावांमध्ये या स्वरूपाचे जलसंवर्धनाचे काम सुरू करण्याचा तथा ग्रामीण रोजगार निर्मीतीचा मानस असून जलयोद्ध्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या संख्येने हजर राहण्याचे आवाहन मोती गारदा नदी संवर्धन प्रकल्प तथा चला जाणूया नदीला अभियानाच्या वतिने करण्यात आले आहे,

थोडे नवीन जरा जुने